शिवसेना आमदारांची संध्याकाळी तातडीची बैठक; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. शिंदे यांच्यासोबत ४० आमदार असून, ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता आज बुधवारी (ता २२) संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवून या बैठकीला हजर राहण्यास सांगितले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

काय म्हटलंय पत्रात?

राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजेच, बुधवार २२ जून, २०२२ रोजी, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल, पत्यावर पाठवण्यात आली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमं, व्हॉट्स अॅप आणि एसएमएस द्वारेही पाठवण्यात आली आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणं दिल्याशिवाय या बैठकीला तुम्हाला गैरहजर रहाता येणार नाही.

सदर बैठकीत आपण उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेनं शिवसेना पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असं मानलं जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदीं नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Share