पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले!

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय भूकंप झाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बुधवारी पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत भाष्य केले. पंतप्रधान मोदी देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, असा टोला भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना लगावला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असे ट्वीट करत सरकार पडण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी आपण अद्याप हे ट्वीट पाहिले नसल्याचे सांगितले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका घेतील का? असे विचारले असता भुजबळ म्हणाले, मला तरी तसे वाटत नाही. ही नेहमीप्रमाणे होणारी बैठक आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत बोलताना, असे काही होत असल्याचे माझ्या कानावर आले नव्हते. शिवसेनेच्या अंतर्गत मुद्द्यावर मी काय बोलणार, असे सांगत भुजबळांनी जास्त बोलणे टाळले. सरकारमध्ये राहणे, सरकार पडणे, राजीनामा देणे या सगळ्या गोष्टी आम्हाला, शरद पवारांना काही नवीन नाहीत. मध्यावधी निवडणुका होऊ दे अथवा काहीही होऊ दे. आम्ही राजकारणी आहोत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नेहमी निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

Share