पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण

मुंबई- राज्यात बारावी बोर्डाचा पेपर फुटल्याच वृत्त सकाळपासून समाज माध्यमांवर प्रसिध्द होतं आहे. मुंबईतील मलाड येथे रसायनशास्त्राचा आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे गणीताचा पेपर फुटला असल्याच समोर आलं आहे. या पेपर फुटी संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिलं असून या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हंटले आहे.

शनिवारी दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

पुढे त्या म्हणाल्या की, विले पार्लेमधील एका केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या फोनमध्ये १० वाजून २४ मिनिटांनी प्रश्नपत्रिका आढळली होती. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर वाटप झाल्यानंतर आढळली आहे. हा प्रकार गंभीर आहे, याप्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोर्डाच्या चौकशीनुसार, पेपर वाटप केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फोनमध्ये आढळली होती. मात्र पेपर फुटलेला नाही, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशीत आणखी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Share