शेतकरी संघटना लढवणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका

अमरावती : शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे कायदे करण्यासाठी आतापर्यंत आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काहीही करू शकले नाहीत. आता महापालिका, जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य निवडून आल्याशिवाय आमदार, खासदारकीची वाट मोकळी होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख धनंजय पाटील काकडे यांनी दिली.

शेतकरी संघटना विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांसोबत सध्यातरी शेतकरी संघटनेची युती होणार नाही. कारण शेतकरी हिताचे कायदे तयार करणे व शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, या विषयावर ते शेतकरी संघटनेसोबत एकत्र येऊ शकत नाहीत. शहरी विकासाच्या कामात शेतकरी संघटना महापालिकेतील उमेदवारांना मदत करण्यास तयार आहे. कारण शहरात येणारे लोक हे ग्रामीण भागातूनच आलेले आहेत. शेतकरी संघटनेला स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष विरहित निवडणूक लढावी लागणार आहे. पुढील निवडणुका शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली स्वतंत्रपणे लढण्यात येतील, असेही धनंजय पाटील काकडे यांनी म्हटले आहे.

आंबेडकरी चळवळीतील सर्व गट, संभाजी ब्रिगेड तसेच शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्व लहान-मोठ्या संघटना, लोक चळवळीतील सर्व लहान गटांनी ही निवडणूक शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढवावी, तरच शेतकऱ्यांना व मजुरांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे.

या देशात भ्रष्टाचारावरून फक्त राजकीय पक्ष एकमेकांवर केवळ आरोप करतात. सर्वच आमदार-खासदारांचे हिशेब तपासणे आता गरजेचे आहे. या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या घामाने जमा झालेल्या शासनाच्या तिजोरीत फक्त चोऱ्या केल्या आहे. भारत देशाला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक जर मतदारांनी आता मिटवला नाही तर तो पुढेही मिटणार नाही. शेतकरी चळवळीला बळकटी आणण्यासाठी, न्याय व हक्कासाठी सर्वांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही धनंजय पाटील काकडे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

Share