सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गृहमंत्र्यांची सूचना

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना केली आहे. आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पंचायत राज समितीच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी गुरुवारी (१६ जून) सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल ‘मामा-भाचा’चे मालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवून अनेक महिन्यांपासून रखडलेले जेवणाचे ६६ हजार ४५० रुपये बिल दिल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, असा पवित्र घेतला होता. मात्र, सदाभाऊ खोत यांनी हे आरोप फेटाळले होते. ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची चाल असल्याचा आरोप खोत यांनी केला होता. टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीचा नेता यामागे होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून विशेषत: पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोपही सदाभाऊंनी केला होता.

या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना आज सकाळीच पोलिस महासंचालकांना दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. याप्रसंगी वळसे पाटील म्हणाले, मला असे काही वाटत नाही की, सदाभाऊ खोत यांच्या जीविताला धोका आहे; परंतु तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे ती लक्षात घेता आणि त्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आज सकाळीच राज्याच्या पोलिस महासंचालकांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.

विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील
शरद पवार यांच्या भेटीविषयी वळसे पाटील म्हणाले, आम्ही नेहमीच शरद पवारांना भेटत असतो, अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या असतात, त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे असते, त्यानुसार आज मी त्यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे तयारी करत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी परिस्थिती वेगळी होती, सध्या विधान परिषदेची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही यावेळी वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जाणीवपूर्वक काही घडलेले नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात शुक्रवारी संध्याकाळी एक कार घुसली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याविषयी माहिती देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ती घटना अनवधानाने घडलेली आहे. त्यामध्ये आम्ही संपूर्ण चौकशी केली; परंतु त्यामध्ये काही वेगळा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे फार त्या प्रकाराला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही अर्थात पोलिस यंत्रणेकडून त्या ठिकाणी जो बंदोबस्त पाहिजे होता, त्यामध्ये काही उणीव होती का हे आम्ही तपासतो आहोत. जाणीवपूर्वक काही केले गेले असेल, तर त्यात कारवाई करणे उचित राहील, अन्यथा कारवाई उचित नाही.

Share