वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही; गिरीश महाजनांचा इशारा

जळगाव : येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावमध्ये आज भारनियमनाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

यावेळी महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र असताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते एसीमध्ये बसून हे सर्व पाहात आहेत; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही ठोस उपाय किंवा निर्णय घेताना दिसत नाहीत, असा आरोप महाजन यांनी केला. आघाडी सरकारमधील उदासीनता पाहून सरकारला जाब विचारण्यासाठी आणि भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी आम्ही जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर जळगाव जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करण्यात येतील. शिवाय, एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही.

दरम्यान, भाजपने काढलेला जन आक्रोश मोर्चा हा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात का काढला जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचा हा मोर्चा म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसे यांच्या आरोपाचा समाचार घेताना महाजन म्हणाले, महागाईविरोधात आघाडी सरकारने आंदोलन करून पाहावे, किती लोक येतात ते त्यांना कळेल. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.

Share