‘जेएनपीए’ ठरले देशातील सर्वोत्तम बंदर

मुंबई : रायगड येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) हे लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकानुसार भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर ठरले आहे. लॉजिस्टिक कामगिरीवर आधारित निर्देशांक सूची नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ‘जेएनपीए’ ने सर्वाधिक ८४.६१ अंक मिळवून भारतातील प्रमुख बंदरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

या यादीमध्ये मुंद्रा (८४.१६), पिपावाव (८१.५२), दिल्ली विमानतळ (८१.२७) आणि काकीनाडा (७७.२२) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ने देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे बंदर बनून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. लॉजिस्टिक खर्चात बचत करण्यासाठी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि आयात-निर्यात समुदायासाठी वेळेची बचत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. ‘जेएनपीए’ हे भारतातील आयात-निर्यात व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले आहे, असे ‘जेएनपीए’ चे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.

देशातील सर्व प्रमुख बंदरांसाठी समान असलेल्या ११ निकषांच्या आधारे कामगिरीची क्रमवारी ठरवली जाते. या निकषांमध्ये लॉजिस्टिक वेळ (तासांमध्ये), लॉजिस्टिक खर्चाच्या किती टक्के विलंब खर्च, सीमाशुल्क आणि कागदपत्रांची सुलभता १-१० च्या स्केलवर मोजमाप, एकूण लॉजिस्टिक खर्चाच्या किती टक्के कस्टम क्लिअरिंगचे शुल्क, लॉजिस्टिक खर्चाच्या किती टक्के स्पीड मनी, व्यवसायात अडथळा किंवा विलंब म्हणून १-१० च्या स्केलवर भ्रष्टाचाराचे मोजमाप, त्यात भ्रष्टाचार निर्मूलनाचे उपाय विचारात घेतले गेले. माल उतरवण्यापासून स्टोरेज यार्डमधील सीमा शुल्क तपासणीपर्यंत लागणारा वेळ, स्टोरेज यार्डमधील सीमाशुल्क तपासणीपासून आयातदारांसाठी वस्तू शेवटी बंदराबाहेर गेल्यापर्यंत लागणारा वेळ, सीबीआयसी अधिकार्‍यांकडून मालाच्या तपासणीसाठी बंदरातून माल घेऊन जाण्यासाठी लागणारा वेळ, सीबीआयसी अधिकार्‍यांची तपासणी पूर्ण होण्यापासून ते जहाजावर माल चढविण्यासाठी लागणारा वेळ यांचाही विचार करण्यात आला आहे.

भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर
‘जेएनपीए’ हे रायगड येथे असलेले भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. २६ मे १९८९ रोजी या बंदराची स्थापना झाली असून, कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत ‘जेएनपीटी’ हे देशातील बल्क-कार्गोटर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले. सध्या ‘जेएनपीए’ येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलोवॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गोटर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

‘जेएनपीए’ने अखंड कनेक्टिव्हिटी सोबतच संपूर्णपणे स्वयंचलित आणि एकात्मिक कंटेनर सेवांसह प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी व त्याच बरोबर व्यवहारामध्ये संपूर्ण पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभ करता यावा यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. ‘जेएनपीए’ने पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, प्रक्रिया सुलभ करणे आणि क्रियाकलापांचे डिजिटायझेशन करून व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या अंतर्गत ‘जेएनपीए’ने सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा विकास, बंदर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या फेजचा विकास, स्कॅनर बसवणे, कोस्टल बर्थचा विकास, एकात्मिक कॉमन रेल यार्ड सुविधेचा विकास, डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी, डायरेक्ट पोर्ट एंट्री, आयटीआरएचओ, आरएफआयडी आधारित टर्मिनल गेट व्यवहार, कंटेनर ट्रॅकिंग, जेएनपीए मोबाइल अ‍ॅप, ई-डिलिव्हरी ऑर्डर, पीसीएस सिस्टमचे अपग्रेडेशन आदि अनेक उपायांमुळे जेएनपीएने 2021 या वर्षामध्य एकूण 5.63 दशलक्ष टीईयूची कंटेनर यशस्वीपणे हाताळणी केली. भारतातील कोणत्याही बंदराद्वारे हाताळली गेलेली ही सर्वोच्च आयात-निर्यात कंटेनर वाहतूक आहे.

Share