माझ्यावरील हल्ल्याची सीबीआय चौकशी व्हावी : किरीट सोमय्या

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. माझ्यावरील शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी या याचिकेमार्फत केली आहे.

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलिस ठाण्यासमोर दगडफेक करण्यात आली. यावेळी गाडीची काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा आरोप करत सोमय्या यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आणि केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली असून, खार पोलिस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेच्या ७० ते ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला केलेल्या शिवसेनेच्या गुंडांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सोमय्या यांनी याचिकेत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची तक्रारही याचिकेच्या माध्यमातून सोमय्या यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्त संजय पांडे खोटे एफआयआर दाखल करतात, असा आरोप सोमय्या यांनी केला असून, या खोट्या एफआयआरच्या विरोधात मी आज मुंबई उच्च न्यायालयात जनहित दाखल केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. न्यायालयाला मी सोमवारी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती करणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले.

Share