देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे! आमदार किसन कथोरे यांचे साईबाबांना साकडे

शिर्डी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी आज शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे त्यांनी साईबाबांना घातले आहे. स्वत: आमदार कथोरे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड पुकारत आपल्या समर्थक आमदारांसह मुंबई सोडली. आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी आज (२२ जून) शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदिरास भेट देत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. यावेळी आ. कथोरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येवो आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होवो, असे साकडे साईबाबांना घातले.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार कथोरे यांनी शिवसेनेवर टीका केली. मतदारसंघासाठी निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदारांमध्ये खदखद होती. निधी मिळत नसल्याचे अनेक शिवसेना आमदारांनी मला बोलून दाखवले. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा असतानासुद्धा निधी मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या सेना आमदारांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्या सर्व आमदारांना माझ्या मनापासून शुभेच्छा, असेही आ. कथोरे म्हणाले.

आ. कथोरे म्हणाले, राज्यात आता फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे सरकार सत्तेवर येईल. भाजप ज्या दिवशी सत्ता स्थापन करेल त्या दिवशी आणखी आमदार जोडले जातील. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते आहेत. ४० पेक्षा जास्त आमदार त्यांच्याबरोबर आहेत. मग शिवसेना राहिली कुठे? शिवसेनेत किती खदखद आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड म्हणजे भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आमदारांची खदखद बाहेर पडली. हे सरकार पाडू असे देवेंद्र फडणवीस कधीही म्हणाले नाहीत. त्यांच्या कर्माने हे सरकार पडेल, असे फडणवीस म्हणाले होते आणि ते पडले आहे, असे चित्र आहे, असेही आ. कथोरे यांनी सांगितले.

Share