कितीही विरोध झाला तरी उद्या ‘मातोश्री’वर जाणारच! : आ. रवी राणा

मुंबई : आम्ही ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असून, आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही शांततेत हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आलो आहोत. पोलिसांनी आम्हाला घरातून बाहेर पडू नका, यासाठी नोटीस दिली आहे. कितीही विरोध झाला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत उद्या (२३ एप्रिल) सकाळी ९ वाजता ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणारच, असा निर्धार आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून, मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांना गुंगारा देत आज (शुक्रवार) मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. त्यानंतर रवी राणा व नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत हनुमान चालिसा पठण करण्यासाठी उद्या ‘मातोश्री’ वर जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आ. रवी राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, हिंदुत्त्वाच्या नावावर मते घेऊनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले; पण आज याच हिंदुत्त्वाचा त्यांना विसर पडला आहे. बाळासाहेबांनी शिकवलेल्या हिंदुत्त्वाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी भगदाड पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भात येत नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. दोन वर्षे मंत्रालयात येत नाहीत. राज्याचा विकास खुंटला आहे. ही साडेसाती दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, अशी विनंती आम्ही केली होती; पण काही लोकांनी त्याला विरोध केला.  हनुमान चालिसाला विरोध करणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत.

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालिसा पठणावर ठाम आहोत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. एक वेळा नाही तर १०० वेळा हनुमान चालिसा वाचायला सांगितले असते. आम्ही कायदा, सुव्यवस्थेचे पालन करू, मुंबईकरांना कुठलाही त्रास देणार नाही. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही रवी राणा यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे जर शिवसैनिक असते तर त्यांनी आमच्यासोबत हनुमान चालिसा पठण केले असते. बजरंगबलीचे नाव घेऊन मी येथे आलो आहे. शिवसैनिकांनी धमकी दिली होती, मुंबई पाय ठेवून दाखवा. त्यांना सांगू इच्छितो की, अरे मी मुंबईत आलो आहे. हनुमान चालिसा वाचल्याने मी इथपर्यंत आलो असल्याचे आ. राणा म्हणाले.

संजय राऊत म्हणजे पोपट : नवनीत राणा यांचा हल्लाबोल
संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमवून बडबड करत असतात. गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार आहे, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावला. शिवसैनिक आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आम्ही मुंबईत आलो आहोत, असे सांगून त्या म्हणाल्या, वीज टंचाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ठाकरे सरकार काहीच बोलत नाही. महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रावर अनेक संकटे येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेसाठी कधी आपले विचार बदलले नाहीत; पण आज उद्धव ठाकरे व हे सरकार आपले मूळ विचारच बदलत आहे, अशी टीका त्यानी केली.

Share