आधी आमचे जीएसटी थकबाकीचे पैसे द्या; उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे, असा तीव्र आक्षेप घेत, अगोदर केंद्राकडे महाराष्ट्राचे जीएसटी थकबाकीपोटी बाकी असलेले २६ हजार ५०० कोटी रुपये द्या, दुजाभाव कमी करा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोरोना (कोव्हिड-१९) च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत, असा आरोप केला. मोदींनी इंधनावरील ‘व्हॅट’ कमी न करणाऱ्या महाराष्ट्रासह काही राज्यांची थेट नावे घेत खडे बोल सुनावले. मोदींच्या या विधानांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत नाराजी जाहीर केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1519229223147569153?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519229223147569153%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmaharashtra-cm-uddhav-thackeray-on-pm-narendra-modi-covid-meeting-petrol-diesel-vat-sgy-87-2905669%2F

२६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकी मिळणे बाकी
महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले, तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या संबोधनानंतर केंद्र सरकारला करून दिली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1519259319434244096?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519259319434244096%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmaharashtra-cm-uddhav-thackeray-on-pm-narendra-modi-covid-meeting-petrol-diesel-vat-sgy-87-2905669%2F

सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळावी
आज राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी ‘एनडीआरएफ’चे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करीत आलेली आहे. मात्र, केंद्राने यावर काहीही पावले उचलली नाहीत. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे. तोक्तसारख्या चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही, तर त्यांना ती मिळेल हे पाहिले. कोविड काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केले. शिवभोजनसारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले ही वस्तुस्थिती नाही
आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा, तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले ही वस्तुस्थिती नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Share