राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावले!

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी एक ट्विट करून या प्रकाराचा निषेध केला आहे. राज ठाकरे यांनी या ट्विटद्वारे केतकी चितळेला महाराष्ट्राच्या महापुरुषांची, संतांच्या शिकवणीची आठवण करून दिली आहे. कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील; परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की, नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हेदेखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

 

 

Share