जल आक्रोश मोर्चावर शिवसेना, एमआयएमची जोरदार टीका

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरुन भाजपतर्फे ‘जल आक्रोश मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले होते. यात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रिकामे हंडे आणि घागरी घेऊन सहभाग घेतला होता. मात्र, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या जल आक्रोश मोर्चावर टीका केली आहे.

पैसे देऊन भाजपनं मोर्चासाठी लोक आणल्याचा आरोप शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. त्याबाबत एक व्हिडीओही त्यांनी माध्यमांना दिला आहे. ‘भाजपच्या वल्गना फोल ठरल्या. एजन्सीला पैसे देऊन भाजपनं लोक आणली. समांतरला भाजपच्याच लोकांनी विरोध | केला’, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच सर्व योजना मुख्यमंत्र्यांनी आणल्या आणि फडणवीस भाजपचं नाव घेत असल्याचेही दानवे म्हणाले. फडणवीस फक्त नागपूरकडेच लक्ष देतात असही दानवेंनी आरोप केला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. आता औरंगाबादकरांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. भाजपने गोर गरीबांना हंडे देण्याचं आश्वासन दिलं होतं, आज त्यांनी हंडे वाटले. या मोर्चात एक आजी तिला हंडा मिळाला म्हणून नाचत होती. हंड्यावर त्यांचे नाव, फोटो होते. लोकांना हंड्यांचं आमिश दाखवून बोलावलं होतं, असा आरोप जलील यांनी केला आहे. तसंच फडणवीस म्हणाले की महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झालीय. मग ३० वर्षे तुम्ही सत्तेत होता. तुमचे लोक शिवसेनेसोबत सत्तेत होते. त्यावेळी तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही कारवाई का केली नाही? तुम्ही मुख्यमंत्री असून कुणाला निलंबीत केलं का? असा सवालही जलील यांनी विचारला आहे.

Share