‘बैल कधीच एकटा येत नाय, जोडीनं येतो’; फडणवीसांनी ऐकवला ‘मुळशी पॅटर्न’चा डायलॉग

पुणे : ”बैल कधीही एकटा येत नाय, तो जोडीनं येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो. त्यामुळे नांगर कोणाकरिता जो बैलगाड्याला विरोध करतो त्याकरिता”, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील डायलॉग उपस्थितांना ऐकवला.
देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पिंपरी-चिंचवडमधील टाळगाव चिखली (जाधववाडी) येथील रामायण मैदानावर पार पडली. आज या शर्यतीचा समारोप कार्यक्रम होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी त्यांचा पोशाख, त्याला लागलेली झूल आणि ‘मुळशी पॅटर्न’चा डायलॉग ऐकवला.

देवा, हिरा, शंभू, पक्षा, लेझर, मंगुळा, बादल, सर्ज्या, बाल्या, सोन्या…. अशी तिथल्या शर्यतीत सहभागी झालेल्या बैलांची नावं घेत फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या बैलांना त्यांनी ‘स्टार’ म्हणून संबोधले. तसेच शर्यतीतला उत्साह पाहून मला आनंद होत आहे, असे फडणवीस म्हणाले.

…म्हणून मला झूल घालून आणलं -फडणवीस

आज देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीपेक्षा जरा वेगळा पोशाख घातला होता. त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “बैलगाडा शर्यतीत बैलाला धावावं लागतं, म्हणून त्याला झूल घालता येत नाही. म्हणून मुख्य अतिथीला झूल घालून भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी कार्यक्रमात आणलं आहे. हा ड्रेस त्यांनीच मला शिवून दिला. हा पोशाख घालूनच या कार्यक्रमात यावं लागेल असं सांगितलं, म्हणून मी हा पोशाख घातला, असे फडणवीस म्हणाले.

ऐकवला ‘मुळशी पॅटर्न’चा डायलॉग
“काही लोक मला म्हणाले की, आज तुम्ही आणि महेश लांडगे सारखेच दिसत आहात. मी त्यांना सांगितलं की, ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमा पाहिलाय का? तर ते म्हणाले, हो पाहिला. मग त्यात काय म्हटलंय, बैल कधीही एकटा येत नाय, तो जोडीनं येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो. त्यामुळे नांगर कोणाकरता जो बैलगाड्याला विरोध करतो त्याकरिता”, असे म्हणत फडणवीस यांनी ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमातील डायलॉग पेश केला.

फडणवीस म्हणाले, “आज हा आनंद आहे की, या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्वात मोठी शर्यत महेश लांडगेंनी सुरू केली. त्याबाबत त्यांचं मी अभिनंदन करतो. महेशदादांनी मला श्रेय दिलं; पण हे माझं श्रेय नाही, हे त्यांचंच श्रेय आहे. त्यांनी आणि अखील भारतीय बैलगाडा परिषदेने या ठिकाणी जी काही मेहनत घेतली, त्यामुळेच बैलगाडा शर्यत सुरू होऊ शकली”, असे म्हणत त्यांनी आमदार महेश लांडगे यांचे कौतुक केले. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी आम्ही कायदा केला. अनेक अडचणी आल्या. पण, बैल हा धावणारा प्राणी आहे, हा शास्त्रशुद्ध अहवाल आम्ही तयार केला आणि त्याच आधारावर अंतिम निर्णय आला. यात आमची साथ होतीच; पण हे सर्वांचे यश आहे, असेही फडणवीस म्हणाले.

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पिंपरी-चिंचवडमधील टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर भरवण्यात आली होती. २८ ते ३१ मे २०२२ अशी चार दिवस ही शर्यत झाली.

Share