माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे विरोधकांचे षडयंत्र : आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : महिला अत्याचार प्रकरणी माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे. याबाबत आपण लवकरच सविस्तर बोलणार असून, दूध का दूध आणि पानी का पानी करणार आहोत, असे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी आज सांगितले.

आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आणि धमकी दिल्याचा आरोप केल्यानंतर आ. नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने आमदार गणेश नाईक यांना जामीन नामंजूर केला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आ. गणेश नाईक यांनी बुधवारी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन नवी मुंबईतील अडचणींविषयी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील आरोपांवर भाष्य केले.

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे विरोधकांचे षडयंत्र आहे. काही जणांना राजकारणात योग्य ते स्थान मिळाले नसल्याने हे षडयंत्र असल्याचा आरोप आ. गणेश नाईक यांनी केला. येत्या काळात मी माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर सविस्तर बोलणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर जास्त भाष्य करू नये, असे कोर्टाने सांगितले आहे. काही दिवसात सर्व सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

गेल्या २५ वर्षात ज्यांना राजकारणात, समाजकरणात उद्धिष्ट साध्य करता आले नाही त्यांनी अन्यायकारक पद्धतीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. हायकोर्टाने मला दिलासा दिला आहे. मोकळीक देताना कोर्टाने काही बंधनं घातली आहेत. त्यामुळे गरज लागेल त्या स्तरावर योग्य पद्धतीने मी समोर जाणार आहे. हे प्रकरण संपल्यानंतर मनातील गोष्टी सांगण्यासाठी सर्वांशी संवाद साधणार आहे, असे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.

Share