राज्यात उन्हाचा तडाखा कायम ; विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट

मुंबई-  देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे.

पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.  राज्यात १३ मार्चपासून तापमानातील वाढ सुरू झाली होती. राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत ५ ते ६ अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे.

मराठवाडयात  सर्वच भागांतील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. त्यामुळे या भागातही उन्हाचा चटका तीव्र आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, सरासरीच्या तुलनेत ते ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. राज्यात आणखी एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

Share