शरद पवारांची ही जुनीच नीती; त्यांच्या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही

अहमदनगर : आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर समाजाला गोंजारत बसायचे ही शरद पवारांची जुनीच नीती आहे. त्यांच्या या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही, असा टोला भाजपचे नेते आणि माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. ते संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीविषयी प्रतिक्रिया देताना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘जो बूॅंदसे गई वो हौदसे नही आती’ अशी मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ फार्स आहे. दोन तासांच्या भेटीमधून आयोग नेमका कोणता डेटा गोळा करणारॽ वास्तविक ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन माहिती संकलीत केली पाहिजे. मात्र, आयोगाचे सदस्य फक्त एका महसूल विभागात जाऊन अवघ्या दोन तासात जर माहिती गोळा करणार असतील तर यातून नेमका कोणता डेटा हाती लागणार? यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या गायकवाड आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सुनावणी घेत नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले होते, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही आ.विखे पाटील म्हणाले.

केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करांमध्ये कपात केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील ९ कोटी लाभार्थींना २०० रुपयांचे अनुदान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलासा दिला. केंद्राच्या निर्णयावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले? हे एकदा तरी सांगावे. सर्वच गोष्टी केंद्र सरकारने करायच्या मग तुमचे योगदान कायॽ मुख्यमंत्र्यांनी फक्त मुंबई पुरते निर्णय घेतले. मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांना जनताच दिसत नाही, अशी टीका आ.विखे पाटील यांनी केली.

Share