तृप्ती देसाईंचा केतकी चितळेला पाठिंबा; म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी कविता पोस्ट करणारी टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरुद्ध राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असताना भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेचे समर्थन केले आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवार यांचे थेट नाव घेण्यात आलेले नाही, असे सांगताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी कविता फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी रात्री ठाणे पोलिसांनी अटक केली. केतकीला रविवारी ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून केतकी चितळेचा तीव्र निषेध केला जात आहे. आता या वादामध्ये भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाईं यांनी उडी घेत केतकीची बाजू घेतली आहे. केतकीच्या पोस्टमध्ये थेट पवारांचे नाव घेण्यात आलेले नाही, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

तुम्ही केतकी चितळेला तुम्ही पाठिंबा देताना दिसताय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तृप्ती देसाई म्हणाल्या, केतकी चितळेने जी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यामध्ये पवार असा उल्लेख होता. शरद पवार असे पूर्ण नाव लिहिलेले नाही. त्यामुळे ते नेमके शरद पवारांबद्दलच बोलले आहे, या विषयावर कदाचित न्यायालयामध्ये ही केस टिकू शकणार नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिले असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे; पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला विरोध करत आहेत, तिला ट्रोलिंग करत आहेत, तिचे आक्षेपार्ह फोटो टाकत आहेत, शिवीगाळ करत आहेत मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न तृप्ती देसाईंनी उपस्थित केला आहे.

केतकीला अटक झाली ती आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल. नंतर तिच्यावर विविध कलम लावले गेले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोण बिघडवत आहे हे नीट पाहिले पाहिजे. पवारांचे समर्थकच कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत. म्हणून एखाद्या महिलेला टार्गेट केले जात असेल, कलमं लावली जात असेल तर नक्कीच ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध केला आहे. जे कोणी केतकी चितळेबद्दल अशा घाणेरड्या कमेंट करतायत त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

केतकी चितळेला अटक झाली आहे ती एफआयआर दाखल झाल्यावर. वेगवेगळे कलम लावल्याने तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिला अडकवण्यासाठी वेगवेगळे कलमे लावणे, ही कुठल्या पक्षाची परंपरा आहे? कायदा सगळ्यांना समान आहे. आमच्यावरही अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट केले गेले. आम्हालाही ट्रोलिंग केले गेले. आम्ही गुन्हे दाखल केले. कधीही कुणाला अटक केली गेली नाही. म्हणजे विशिष्ट नेत्यावरच पोस्ट टाकल्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल आरोपींना अटक होते का? त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जाते का? असे प्रश्न तृप्ती देसाईं यांनी उपस्थित केले आहेत.

कायदा सर्वासाठी समान असताना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय आहे का? आपल्या राज्यात हा जो काही भेदभाव चाललेला आहे तो चुकीचा आहे. केतकी चितळेला पाठिंबा दिल्यावर सगळे जातीवर येतात, अशी खंतही तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली. ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करता. अनेकजण म्हणतात त्या चितळे आहेत, तुम्ही देसाई आहात. त्या ब्राह्मण आहेत, तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही सपोर्ट करताय. म्हणून मी सोशल मीडियावर लोकांना सांगितले की, मी ब्राम्हण मुळीच नाही. मी ९६ कुळी मराठा आहे. मी ज्या ९६ कुळी मराठ्यांच्या घरातून येते तिथे मला सर्वधर्म समभावाचा आणि परखड मत मांडण्याचा अधिकार आणि संस्कार दिले आहेत, म्हणून मी माझे मत मांडले आहे. केतकी चितळेचा अटक केली आहे, तिच्यावर वेगवेगळे कलम लावले आहेत, मग तुमच्या समर्थकांवरही तसेच गुन्हे दाखल करा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

 

Share