विधवा प्रथा बंद करणार;हेरवाड ग्रामपंचायतचे क्रांतिकारी पाऊल

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावाने महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांनी यासाठी पुढाकार घेऊन समाजात विधवा म्हणून अपमानाचे जगणे झुगारून देण्याचे ठरविले आहे. हेरवाड ग्रामपंचायतने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

‘पुरोगामी राज्य’ अशी महाराष्ट्राची संपूर्ण देशभरात ओळख आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार अशा अनेक योजना आणि कामाची सुरुवात महाराष्ट्र राज्यात झाली आणि त्या योजना देशाने स्वीकारल्या. आता छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेत गावकऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा कृतिशीलपणे पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.

आपल्या समाजात पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे असे प्रकार प्रथा-परंपरेनुसार होतात. पायातील जोडवी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, ही परिस्थिती आहे. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यास ही सभा मंजुरी देत आहे, असा ठराव हेरवाड येथील ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

हेरवाड ग्रामपंचायतचे सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत मुक्ताबाई संजय पुजारी यांनी हा ठराव मांडला. तर, सुजाता केशव गुरव यांनी अनुमोदन दिले आहे. हेरवाड ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे सोशल मीडियावरून स्वागत करण्यात येत आहे. हेरवाड ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनदेखील केले जात आहे.

Share