संतप्त शेतकऱ्याने आधी उसाला लावली आग अन् नंतर गळफास घेऊन केली आत्महत्या!

बीड : अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत चालला असून, बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने एका ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतातील ऊस पेटवून देत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे बुधवारी दुपारी घडली. नामदेव आसाराम जाधव (रा. हिंगणगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव (वय ३२) यांच्याकडे एकूण यांच्याकडे ३ एकर जमीन आहे. त्यापैकी १ एकरमध्ये त्यांनी २६५ जातीच्या उसाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र, हा ऊस आता तोडणीला येऊनदेखील परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी नामदेव जाधव हे कारखान्याकडे फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांना कारखान्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नैराश्यात असलेल्या नामदेव जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले.

बुधवारी (११ मे) दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी उसाच्या फडाला आग लावली. त्यानंतर त्या ठिकाणीच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जाधव यांनी बँकेचे व खासगी कर्ज घेतल्याचे सांगितले जात आहे. जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी नोंद केली असून, अधिक तपास सुरू केला आहे.

उसाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून, जवळपास ३० ते ४० हजार मेट्रिक टन ऊस गाळपावाचून अद्यापही जिल्ह्यात शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असताना देखील साखर कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस गाळपासाठी आयात करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तळहाताच्या फोडासारखा जपलेला ऊस कुठे घालावा? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. कारखाना ऊस घेऊन जाईल का नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या कारणाने अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Share