भाजपा आमची शत्रू नाही; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचे सूचक ट्विट

मुंबई : शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये न जाता अजूनही आम्ही शिवसेनेतच असून, उद्धव ठाकरेच आमचे पक्षप्रमुख असल्याचे ठामपणे सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलेले असतानाच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ”भाजपा आमची शत्रू नाही”, असे म्हणत दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे आदरणीय असल्याचा उल्लेख या ट्विटमध्ये केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत अजूनही गळती सुरूच असून, शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोरचे आव्हान आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसे पेलणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अजूनही पाठिंबा मिळत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली असल्यामुळे शिवसेनेचे अजून काही आमदार किंवा खासदार शिंदे गटाला जाऊन मिळणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनातून राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

दीपाली सय्यद यांनी काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे आपल्याला कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असे म्हटले आहे. “शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतील तर त्यांना एवढेच सांगणे आहे की, आमच्यातली शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. एकनाथ शिंदेंनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका”, असे या ट्विटमध्ये दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

भविष्यात काय होईल, माहीत नाही
दरम्यान, पुढे काय होईल, हे आपल्याला माहीत नसल्याचे दीपाली सय्यद यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे. “भाजपा आमची शत्रू नाही. त्यांच्याविरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही; पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही; पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे”, असा सूचक उल्लेख दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये केला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी “या सगळ्यात सिवसैनिक हरला असून, शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवून शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे”, असा सल्ला ट्विटच्या माध्यमातून दिला होता.

Share