वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ

मुंबई : कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षे आषाढी वारी सोहळा बंद होता. दोन वर्षांनंतर यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज आदी संतांच्या पालख्यांनी आषाढीच्या वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. राज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आता या वारकऱ्यांसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.”

वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या असून, वारकरी दिंड्यांवर जास्त फोकस करा. तसेच यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ४ हजार ७०० एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. गरज लागल्यास आणखी एसटी बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या जातील, असे शिंदे यांनी सांगितले. वारी यशस्वी होईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पांडुरंगाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री म्हणून पूजा करण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण कुटुंब पांडुरंगाच्या पूजेला जाणार आहे, असे शिंदे म्हणाले. वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीची वारी यशस्वी होणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते, असे म्हणत त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

Share