उद्धव ठाकरेंच्या भोवती असणाऱ्या बडव्यांमुळे ते बदनाम झाले : आमदार देवेंद्र भुयार

नागपूर : शिवसेनेचे बंडखोर आमदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाहीत; परंतु उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या बडव्यांवर ते नाराज आहेत. शिवसेनेतील फुटीसाठी हे बडवेच कारणीभूत आहेत. आमचा विठ्ठल चांगला, मात्र त्याच्या अवतीभवती असलेल्या चार-पाच बडव्यांनी त्यांना घेरले आहे. त्यामुळे आमचा विठ्ठल आणि ‘मातोश्री’ बदनाम होत आहे, अशी टीका मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केली.

आज गुरुवारी सकाळी नागपूरमध्ये आमदार देवेंद्र भुयार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या चार-पाच बडव्यांनी त्यांना घेरले आहे. त्यांच्यामुळेच आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. मी बडव्यांची नावे घेणार नाही; पण मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय? कौशल्य काय? हे सर्वांनाच माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही, असा आरोपही आमदार भुयार यांनी केला आहे.

यावेळी आमदार भुयार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्त्वावर शंका नाही; परंतु त्यांच्याभोवती असणाऱ्या बडव्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘मातोश्री’ हे ठिकाण आजही पवित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी आज जो काही निर्णय घेतलाय, तो बदलून ते पुन्हा ‘मातोश्री’वर जातील यामध्ये शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या दोन-चार लोकांमुळे आज ४३-४४ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होत नाही, भेटीसाठी त्यांची वेळ मिळत नाही, हेच या आमदारांच्या नाराजीचे मुख्य कारण आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांची कोणतीही नाराजी नाही. त्यांनी कोणाचे नुकसान केलेले नाही, असे आ.भुयार यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणारे बडवे म्हणजे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे आहेत का, असा प्रश्न विचारला असता, आ. भुयार म्हणाले, संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात फार मोठा वाटा आहे. तसेच ठाकरे सरकार चालावे, हीच त्यांची भूमिका आहे. मला स्वत:ला दोनवेळा संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले होते, असे सांगत आ. भुयार यांनी एकप्रकारे संजय राऊत यांची पाठराखण केली. त्यामुळे आ. भुयार यांच्या टीकेचा रोख मिलिंद नार्वेकर यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते.

सध्या अनेक आमदार गुवाहाटीकडे प्रयाण करत आहेत. आ. भुयार यांना तुम्ही खरेच मुंबईला जाताय की, गुवाहाटीला, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आ. भुयार यांनी त्यांचे विमान तिकीट दाखवले. मी आडवातिडवा मार्ग घेत नाही. माझ्याकडे ‘मातोश्री’चा मार्ग नाही. रेशीमबागेत मी जात नाही. मी केवळ ‘सिल्व्हर ओक’वर जातो, असे ते म्हणाले.

मी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीसोबतच आहे आणि यापुढेही राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जसा आदेश देतील, त्याप्रमाणे मी काम करणार आहे. आघाडी सरकारवरचे संकट दूर होईल. शिवसेनेत बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसांत परत येतील, असा विश्‍वासही आ. भुयार यांनी व्यक्त केला.

Share