शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

अकोला : रस्त्याच्या कामात १ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण आणि जलसंपदा राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर अकोला शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

अकोला जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने डॉ.पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत अकोला न्यायालयात प्रकरण दाखल केले. पालकमंत्री लोकसेवक असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी ९० दिवसांच्या आत राज्यपालांची परवानगी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांनी कायद्यानुसार दस्तऐवज सादर करण्याचे त्यांना सांगितले. राज्यपालांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते.

कायद्यातील तरतुदीनुसार ९० दिवसांमध्ये राज्यपालांकडून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात उत्तर न आल्याने न्यायालयाने मंगळवारी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधातील तक्रारीवर तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात अपहार झाल्याचे प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात अकोला शहर कोतवाली पोलिसांनी बुधवारी पहाटे राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात भादंवि कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

‘या’ तीन रस्त्यांच्या कामात अपहाराचा आरोप…
पालकमंत्री बच्चू कडू यांनी गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पूल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांचा, इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांचा तसेच कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग असल्याचे दाखवत यासाठी निधी वळता करीत १ कोटी २५ लाखांच्या निधीचा अपहार केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने निकाल देत राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने बच्चू कडू अडचणीत सापडले आहेत.

Share