राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, त्यात गैर काय?

पुणे : महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, त्यात गैर काय? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या गाडीवर काल रात्री तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला. त्याआधी भाजपच्या मुंबईतील पोलखोल यात्रेच्या रथाची मोडतोड करण्यात आली. यातील हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळले. तसेच अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास निघाले होते. यावेळी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर जमाव जमवून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. एखाद्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर शिवसैनिक घरात घुसून दमबाजी करतात. राज्यात हुकूमशाही आली का, आणीबाणी लागू झाली का, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत. याबाबत भाजपकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांना राज्य चालविता येत नाही का?
हनुमान चालिसा म्हणण्यात विरोध करण्यासारखे काय आहे? एखादी व्यक्ती आपल्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याला मानाने घरात बोलावावे. तसे नको असेल तर रोखण्यासाठी पोलिसांना बोलवावे; परंतु सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरविणे आणि त्यांनी हिंसक विरोध करणे हे अनाकलनीय आहे. मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात पोलिस कमी पडले का, त्यांना राज्य चालविता येत नाही का, असे प्रश्न यातून निर्माण होतात, असे ते म्हणाले.

कमिशनसाठी राज्यात कृत्रिम वीजटंचाई
वीज खरेदीत कमिशन मिळावे यासाठी राज्यात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून लोडशेडिंग केले जात आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असूनही शेतकरी ते पिकांना देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते त्यावेळी पाच वर्षे राज्यात लोडशेडिंग बंद होते; पण आता पुन्हा कमिशनसाठी लोडशेडिंगचे कृत्रिम संकट आणले आहे. भाजप हे सहन करणार नाही. याच्या विरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Share