राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली होती. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज (रविवार) त्या दोघांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल, असे सांगितले.

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याला ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी विरोध केला. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचे असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केले. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिले. त्यामुळे त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळे त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲड. रिझवान मर्चंट व ॲड. वैभव कृष्णा यांनी आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा यांची बाजू मांडली तर ॲड. प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली. ॲड. रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील ॲड. मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला आणि पोलिस कोठडी देण्यासही विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार देत पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल, असे सांगितले. जामीन मिळेपर्यंत आ. रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर खा. नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्य शनिवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार होते; परंतु आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानासमोर ठिय्या मारला होता. शिवसैनिकांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यापासून रोखून धरले होते. बराच गदारोळ झाल्यानंतर ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने मागे घेतली. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला घराबाहेर काढले. कलम १५३ (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.

Share