…तर दिवसभर नमाज आणि हनुमान चालिसा म्हणायला मी तयार -राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यात भोंगे, हनुमान चालिसा आणि अजानच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना आता या वादात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार असतील, शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळत असेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पाहिजे तसे शिक्षण मिळत असेल तर मी दिवसभर नमाज पडायला, हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी म्हणाले, सध्या राज्यामध्ये उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू आहे. विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात येते. रोजगार हिरावला जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गॅसचे भाव वाढले आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचे हे प्रश्न महत्त्वाचे असताना या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. भोंगे, हनुमान चालिसा यासारख्या मुद्द्यावरून राजकारण करून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली.अनावश्यक गोष्टीवर वाद करून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केले जात आहे आणि त्यावर राजकीय पोळी भाजली जात आहे, असे शेट्टी यांनी म्हटले.

उसाच्या पिकाबाबत केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचाही राजू शेट्टी यांनी समाचार घेतला. एका बाजूला उसामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे, असे सांगायचे आणि दुसरीकडे नवीन साखर कारखाने विकत घ्यायचे, ही दुटप्पी भूमिका आहे. नितीन गडकरींचे जे चाललेय तेच शरद पवारांचे चाललेय. पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणतात आणि गडकरी आत्महत्या करावी लागेल, असे म्हणतात. दोघेही देशातील जबाबदार नेते आहेत. उसाकडेच शेतकऱ्यांचा ओढा का या प्रश्नाच्या मुळाकडे हे दोघे जात नाहीत. त्यांना माहिती असली तरी प्रश्नाच्या मुळाकडे ते जाणार नाहीत, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

ऊस हे एकमेव पीक आहे, ज्याला केंद्र सरकार हमीभाव जाहीर करते आणि हा हमीभाव देणे कारखान्यांना बंधनकारक असते. त्यामुळे उसाचे उत्पादन वाढले आहे. याच पद्धतीने सर्व पिकांचा हमीभाव केंद्र सरकारने दिला तर उसाचे उत्पादन वाढणार नाही, असे शेट्टींनी म्हटले.

शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी मी राजकारणात आलो. राजकारण करत असताना चळवळीचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेत असतो. त्यामुळे मी फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. जन्माला आलो तेव्हापासून ते मरेपर्यंत मी शेतकरीच राहणार आहे. त्यामुळे मला कोणीही गृहीत धरू नये, अशी माझी भूमिका असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Share