राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर थांबवा : शरद पवार

मुंबई : हनुमान चालिसा पठणच्या वादानंतर राज्य सरकारला आव्हान दिल्याच्या आरोपाखाली अपक्ष खासदार नवनीत राणा व अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेतील ‘१२४-अ’ या कलमान्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातच राजद्रोह (कलम १२४-अ) या कलमाचा गैरवापर घटनादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा हे कलमच रद्द करायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर विविध सूचना मांडण्याच्या उद्देशाने ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत मांडले आहे. कलम ‘१२४-अ’ हे इंग्रजांच्या काळात वाढत्या स्वातंत्र्य चळवळीला दाबण्याच्या उद्देशाने भारतीय दंड विधानात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडच्या काळात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात किंवा लोकशाही व्यवस्थेत शांततेत मांडण्यात आलेला विरोधी विचार दाबण्यासाठीही या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी भारतीय दंड विधान (भादंवि) आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यात (युएपीए) आवश्यक व योग्य त्या तरतुदी आहेत. त्यामुळे १२४-अ या कलमाचा गैरवापर कायदादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा ते कलम रद्द करायला हवे, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

‘माहिती-तंत्रज्ञान कायदा हा दोन दशकांपूर्वी आणण्यात आला. त्यानंतर सायबर क्राईम व सायबर सुरक्षेच्या प्रश्नात आमूलाग्र बदल झाला आहे.अलीकडच्या काळात सोशल मीडियाचाही प्रचंड गैरवापर होत आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडियावर योग्य नियंत्रण नाही. सोशल मीडिया तर सध्या अनिर्बंध स्वरुपात आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही खोटा अपप्रचार कोणत्याही उत्तरदायित्वाविना पसरवला जाऊ शकतो. खोट्या बातम्या व अपप्रचाराच्या माध्यमातून समाजात धार्मिक, जातीय तेढ व गंभीर तणाव निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने संसदेला कायदा दुरुस्तीची शिफारस करणे आवश्यक आहे, असे नमूद करत तशी शिफारस करण्याची विनंती पवार यांनी आयोगाला प्रतिज्ञापत्रात केली आहे. याबरोबरच अन्य विविध कायद्यांतही महत्त्वाच्या सुधारणा पवार यांनी सुचवल्या आहेत.

दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगाची मुंबईतील सुनावणी ५ ते ११ मे या कालावधीत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील दालनात होणार आहे. त्यावेळी आयोगाने शरद पवार यांना ५ मे रोजी साक्ष नोंदण्यासाठी पाचारण केले आहे, अशी माहिती सुनावणीत आयोगातर्फे बाजू मांडणारे अॅड. आशिष सातपुते यांनी दिली.

Share