माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा बदला घेणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजप सरकारने काल पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विश्वासदर्शक ठरावही १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तडाखेबंद भाषण केले. महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असे म्हटल्यानंतर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली. माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी टीकाकारांना दिला.

शिंदे-भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री’ असा केला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना-भाजप युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.

शिवसेना-भाजप युतीचे आमचे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला याबाबत मी शिंदे यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, असे म्हणत फडणवीस यांनी सभागृहात आपल्या भाषणाची सुरुवात केली. हा ठराव प्रचंड मतांनी पारित व्हावा म्हणून सभागृहाबाहेर राहून मदत केलेल्या अदृश्य हातांचे आभार, असे म्हणत फडणवीस यांनी कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांना टोमणा मारला.

याप्रसंगी फडणवीस यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, असे मी सांगितले होते. त्यावेळी मी म्हटले होते की, ‘मी पुन्हा येईन’. त्यावरही माझी टिंगल उडवली; पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो तर यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे की, मी त्यांना माफ केलेय. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सर्वांना संधी मिळते, असे सांगून सत्ता हे आमचे साध्य नाही तर साधन आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते… कोशिश करने से हर मुश्किल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नही जाते.. अशी शेरोशायरी करीत फडणवीस यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव 
मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते जनतेचे सेवेकरी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे त्यांनी ८० च्या दशकात काम सुरू केले. १९८४ मध्ये यांची एकनाथ शिंदे शाखाप्रमुख म्हणून नेमणूक केली होती. या काळात शिंदे यांनी अनेक आंदोलने केली. अनेकदा ते जनतेसाठी कारागृहात गेले. वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊनही एकनाथ शिंदे खंबीर राहिले. गरिबीमुळे शिंदेंना शिक्षण सोडावे लागले. मात्र, वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी पदवी मिळवली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा निर्धार वाखणण्याजोगा आहे. अनेकवेळा लोक राजकारणात पद मिळाल्यानंतर माणुसकी हरवतात; पण एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड माणुसकी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची स्तुती केली.

एकनाथ शिंदे एक वेगळे रसायन आहे, ते झोपतात कधी आणि जेवतात कधी कळत नाही. २४ तास काम करणारा हा नेता आहे. एखादी निवडणूक, अडचण असते तेव्हा तीन दिवस सलग ते काम करताना दिसतात. मोठ्यातल्या मोठ्या किंवा लहान व्यक्तीच्या मदतीला जाण्याची शिकवण त्यांना धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली आहे. ज्यांचे कोणी नाही त्यांचे आनंद दिघे होते. हीच शिकवण त्यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे, असे  फडणवीस म्हणाले.

लोकशाहीत दुसरा आवाज पटो किंवा न पटो ते ऐकून घेतले पाहिजे. प्रत्युत्तर देण्यात काही चुकीचे नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली असता तात्काळ एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांना फोन केला होता. त्यादिवशी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. मी त्यांना सगळे कार्यक्रम सोडून पोहोचण्यास सांगितले. बोटीतून साप शिरत असतानाही त्यांनी प्रवास केला होता. काही पत्रकार अडकले होते, त्यांनीही प्रत्यक्ष हे पाहिले. आदिवासींच्या मोर्चाची व्यवस्थाही शिंदे यांनी केली.

एकनाथ शिंदे आजही ४००-५०० लोकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांनी थोडी वेळ पाळली पाहिजे हे मी त्यांना सांगितले आहे. माणसं भेटली की ते रमतात, समस्या ऐकून घेतात. शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील. त्यांच्यात खूप संयम आहे. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली असावी. शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत नेतृत्व उभे केले. त्यांची दोन मुले अपघातात गेली तेव्हा कुटुंब तुटले होते. जीवनातले सगळे संपले, असा भाव त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यावेळी आनंद दिघे यांनी त्यांना ऊर्जा दिली आणि खरे नेतृत्व उभे केले. नंतर त्यांनी स्वत:पेक्षा जनतेचा विचार केला पाहिजे यातून शिंदे यांनी काम सुरू केले, असे फडणवीस यांनी सांगितले.

होय, महाराष्ट्रात ‘ED’ चेच सरकार; फडणवीसांनी विरोधकांना ठणकावले
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाचे आमदार मतदान करत असताना अनेकांनी ‘ईडी’च्या घोषणा दिल्या होत्या. हाच धागा पकडून फडणवीस म्हणाले, अनेकांनी टीका केली की, शिवसेनेचे आमदार ‘ईडी’मुळे आमच्यासोबत आले. ते खरेच आहे. सर्व आमदार ‘ईडी’मुळेच आमच्यासोबत आले. मात्र, ती ‘ईडी’ म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचादेखील आपल्या भाषणात उल्लेख केला.

 

काही लोकांना आम्ही सत्तेसाठी काही करत आहोत, असे वाटले होते. सत्ता हे आमचे साधन आहे, साध्य नाही. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्यासाठी उपकरण म्हणून आम्हाला सत्ता हवी आहे. माझ्या नेत्याने मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले. ज्या नेतृत्वाने मला सर्वोच्च स्थानावर बसवले त्यांनी घरी बसण्यास सांगितले असते तर तेही केले असते, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकद आणि क्षमतेने मी उभा आहे. त्यांची कारकीर्द अधिक यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्यात, माझ्यात कधी दुरावा, संघर्ष, कुरघोडी दिसणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

Share