हिंगोलीत मुलीच्या छेडछाडीवरून तरुणाचा खून

हिंगोली : मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती आणि खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना हिंगोली शहरात घडली आहे. शुभम राजे (वय २३ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी (१९ एप्रिल) पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तलाव कट्टा भागात मृत शुभम राजे आणि बबलू धाबे यांच्यात काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद लगेचच मिटला. मात्र, या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे आणि त्याच्या सोबत अन्य दोघे जण सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तलाव कट्टा परिसरात आले. यावेळी त्यांनी शुभमला बोलून घेत त्याच्यावर गुप्ती, खंजीर आणि लोखंडी पाईपने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम राजे जागीच कोसळला. त्यानंतर ते तिघेही फरार झाले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडित कच्हवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, व्ही. पी. विठूबोणे, जमादार संजय मार्के, शेख मुजीब, शेख अमजद, शेषराव पोले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शुभम राजे याची आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बबलू धाबे आणि अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन हाती घेऊन मंगळवारी पहाटे ३ वाजता तीन आरोपींना खुशालनगर भागातून ताब्यात घेतले आहे.

Share