बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी शिवसेनेला सुनावले

मुंबई : संजय राऊत, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. संजय राऊतांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात उपचार घ्यावेत, असा टोला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना लगावला आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठीचे आंदोलन हे तुमचा जन्म होण्यापूर्वीपासून सुरू झाले असल्याचे सांगून शेलार यांनी संजय राऊत व शिवसेनेला सुनावले आहे.

मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपने आयोजित केलेल्या जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. बाबरी मशीद पाडली तेव्हा मी तेथे होतो, तेव्हा शिवसेनेचा कोणताही नेता तेथे हजर नव्हता, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला होता. यावर शिवसेना कुठे आहे असे विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल, असे प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. आज सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. आशिष शेलार यांनी खा.संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका करत प्रत्युत्तर दिले.

बोलबच्चनगिरी करू नका. देशाला माहिती आहे की, बाबरी मशीद ढाचा पाडण्याचे आंदोलन साधू-संतांनी सुरू केले, हिंदू समाजाने सुरू केले. तुमचा जन्म ६० नंतरचा आहे. आंदोलन त्याच्या आधीपासून सुरू आहे. जन्म होण्यापूर्वी आणि गोधडी ओली करण्याच्या वेळेला मी कारसेवेला होतो हे म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ही नावं तरी माहिती आहेत का यांना? उगाच श्रेय घेण्याच्या भानगडीत गडबड करू नका, असे म्हणत आ. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

राजकारण हे तुमच्या डोक्यात घुसलेली घाण – शेलार
हनुमान चालिसाचा विषय भाजपचा नाही. पेट्रोलच्या विषयावर भाजपनेच काम केलेय. ज्या पद्धतीने भाजपने करात सवलत दिली, पंतप्रधानांनी त्याची आठवण करून दिली. त्यावेळी कोल्हेकुई का करता? काँग्रेस त्यासाठी आंदोलनं करत होती. मग, आता स्वत:च्या सरकारला सांगा ‘व्हॅट’ कमी करण्यासाठी, त्यावेळी पळ काढायचा. राजकारण हे तुमच्या डोक्यात घुसलेली घाण आहे. ती घाण पहिले साफ करा. जबाबदारी रामसेवकांनी घेतली. लढाई संघ हिंदू परिषद, भाजपने लढली. दुसऱ्यांच्या घरात काही झाल्यावर स्वत: पाय टाकणे हे जबाबदारी घेणे नाही. तुमच्या नावावर साधी एनसीही नाही, केसेसही नाहीत, मग तुम्ही काय अहवालाचे सांगता. बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत तुमचा आईस्क्रीम खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. याकूब मेमनचे समर्थक अस्लम शेख असो की, हसिना पारकरसोबत व्यवहार करणारे नवाब मलिक असो. मुंबईकरांवर हल्ला करणाऱ्यांचे तुम्ही समर्थक आहात. त्यामुळे तुम्ही याबाबत बोलू नका, असेही आ. आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावले.

टोमणे मारणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही – शेलार
आ. शेलार म्हणाले, ज्या पद्धतीने सर्व पक्षांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून बोलण्याचा अधिकार आहे. कायद्याने काम करावे. आजचे सरकार सुडबुद्धीने काम करतेय. सरकार कुठलेही काम सुडबुद्धीने करत असेल तर आमचा त्याला विरोध असेल. टोमणे मारणे, कुचकट बोलणे हे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. तुम्ही बोललात म्हणून तुमच्या कुटुंबावर आम्ही टोमणे मारणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी सूर्यावर थुंकण्याचे काम करू नये.

मग उद्धव ठाकरेंची भाषणेही तपासावी लागतील
चिथावणीची भाषणे बघायची असतील तर मग उद्धव ठाकरेंचीही भाषणे तपासावी लागतील. सर्वच पक्षांचे बघावे लागेल. कुणा एकाला टार्गेट करून राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम कोणी करू नये. बाकी कायद्याचे काम कायदा करेल. हा सगळा प्रकार ठाकरे सरकार, मविआ सरकारचे अपयश आहे. हनुमान चालिसा म्हटल्यावर राजद्रोह होतो हे ज्यावेळी मानले जाते. त्यानंतरच असा प्रसंग घडतो की, कोणीतरी शिवाजी पार्कवर आम्हाला आता नमाज पढू द्या अशी मागणी करतो. या सगळ्यामागे बोटचेपी भूमिका सरकारची आहे. आरती म्हणणाऱ्यांना तडीपारीच्या नोटीसा देणार असाल तर उद्या तुम्ही शिवाजी पार्कवर नमाज पठणाची परवानगी द्यायला मागेपुढे पाहणार नाही. हे धंदे बंद करा. राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टायमिंग दिसतेय. त्यांच्या घड्याळाचे आकडे पुढे जात नसल्याने प्रत्येक गोष्टीत टायमिंग बघण्याची त्यांची सवय आहे. बाळासाहेबांवर आम्ही टीका नाही करणार; पण राऊतांचा, उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे? इतिहास बदलण्यात येत नाही, इतिहास बदण्याची ताकद राऊत तुमच्यात नाही. आमच्यासाठी बाळासाहेब हे वंदनीय होते आणि राहतील, असे आ. शेलार यांनी याप्रसंगी सांगितले.

Share