‘मातोश्री’चे दरवाजे आमच्यासाठी सन्मानाने उघडले तर आम्ही परत जाऊ : आमदार संजय राठोड

यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे आमच्यासाठी सन्मानाने उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आलेले बंडखोर आमदार संजय राठोड यांनी केले. दरम्यान, आ. संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वर परत जाण्यासंबंधी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे.

शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांचे आज प्रथमच यवतमाळ येथे आगमन झाले. पक्षातील उठावानंतर सर्वांचाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोपही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता आ. संजय राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेनेवर कायम अन्याय झाला. शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला शिवसेनेतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता, असे आ. राठोड म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या आ. संजय राठोड यांच्या विरोधात कालपर्यंत घोषणाबाजी करणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही आज आ.राठोड यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला होता.

Share