मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; ‘एनआयए’ चा न्यायालयात दावा

मुंबई : बहुचर्चित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचा दावादेखील ‘एनआयए’कडून करण्यात आला आहे

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकाने भरलेली एक चारचाकी गाडी आढळली होती. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला घाबरवण्यासाठी हा मोठा कट आखण्यात आला होता. संबंधित स्फोटकाने भरलेली चारचाकी गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हिरेन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची सर्व माहिती मनसुख हिरेनला होती. त्यांनी तोंड उघडले तर आपल्या अडचणी वाढतील, अशी भीती बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि इतर आरोपींना होती. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून मनसुख हिरेन यांची हत्या केली. ५ मार्च २०२१ रोजी ठाण्यातील एका खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हाच या हत्येमागील मुख्य सूत्रधार होता, असा दावा एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

आरोपी प्रदीप शर्मा याच्या इतर आरोपींसमवेत कट रचण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये बैठका झाल्याचे ‘एनआयए’ने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी दिल्याचा दावाही ‘एनआयए’ने केला आहे. ‘एनआयए’ने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आरोपी प्रदीप शर्मा हा अंबानी कुटुंबासह लोकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य होता, तर मनसुख हिरेन हा या कटातील कमकुवत दुवा होता. हिरेनला या कटाची संपूर्ण माहिती होती. त्याने तोंड उघडले तर आपण अडचणीत येऊ, अशी भीती आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना होती. यातूनच त्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे.

आरोपी प्रदीप शर्मा याच्या जामीन अर्जाला विरोध करताना ‘एनआयए’ ने म्हटले की, तो निर्दोष नाही. त्याने गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्ये यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. न्यायमूर्ती ए. एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सनप यांच्या खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.

 

Share