शिवसेना ट्रॅपमध्ये अडकली, स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करतेय!

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला आहे. राणा दाम्पत्याच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक निदर्शने सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करत शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे, एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. शिवसेना स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहे, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर ‘मातोश्री’ परिसरात करण्यात आलेला हल्ला, राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर सुरू केलेले आंदोलन आणि इतर काही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशीष शेलार यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी तर थेट केंद्र सरकारकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचा दावा केला आहे.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1517716245814349824?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517716245814349824%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fmns-sandeep-deshpande-tweet-on-shivsena-and-president-rule-in-maharashtra%2Farticleshow%2F91023315.cms

शिवसेनेवर टीका करताना संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मशिदीच्या भोंग्यांवर भाष्य केले आहे. ‘तुमच्या घरासमोर हनुमान चालिसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवले, काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नको आहे. आम्ही काय चुकीचे बोलत आहोत? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

Share