लग्नासाठी आलेल्या तीन मुलांचा कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू

लातूर : लग्न सोहळ्यासाठी आलेली तीन मुले आंघोळीसाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात गेली असता
आंघोळ करताना एकाचा पाय निसटला आणि तो बंधाऱ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य दोघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज शुक्रवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील लाळी (खुर्द) येथे ही दुर्दैवी घटना घडली.

जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. लग्न सोहळ्यासाठी लाळी खुर्द येथे आलेले तीन पाहुण्याकडील मुले आंघोळीसाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात गेले होते. आंघोळ करत असताना पाय निसटून तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. या तिघांचे मृतदेह शोधण्यास उदगीर येथील अग्निशमन दलाला यश आले आहे.

जळकोट तालुक्यातील लाळी (खुर्द) येथे आज २७ मे रोजी तुळशीदास तेलंगे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते. लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यासाठी तेलंगे कुटुंबीयांचे पाहुणे रात्रीच दाखल झाले होते. या लग्नासाठी आलेले संगमेश्वर बंडू तेलंगे (वय १३ वर्षे), चिमा बंडू तेलंगे (वय १५ वर्षे, रा . चिमेगाव, ता. कमालनगर) आणि एकनाथ हनुमंत तेलंगे (वय १५ वर्षे, रा. निडेबन, ता. उदगीर) हे तिघेही जण आंघोळीसाठी तिरू नदीवर असलेल्या लाळी (खुर्द) येथील कोल्हापुरी बंधाऱ्याकडे गेले. आंघोळ करत असताना एकाचा पाय निसटला आणि तो बंधाऱ्यात पडला. यानंतर एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना तिघेही जण पाण्यात बुडाले. या बंधाऱ्यामध्ये खूप पाणी असल्यामुळे त्यांना वर येता आले नाही व यातच तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बंधाऱ्यात बुडालेल्या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले; परंतु खूप पाणी असल्यामुळे त्यांना मृतदेह काढता आले नाहीत. या घटनेची माहिती जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ उदगीर येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्यात उतरून तिन्ही मुलांचे मृतदेह शोधले. घटनास्थळी तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, मंडळ अधिकारी सुरेवाड, तलाठी उमाटे यांनी भेट दिली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लग्नाच्या दिवशीच लाळी (खुर्द) येथील बंधाऱ्यात बुडून पाहुण्याकडील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेलंगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोबतच संपूर्ण लाळी (खुर्द) गावावर दु:खाचे सावट आहे.

Share